तत्कालीन मनपा आयुक्त व नगरअभियंता यांच्यावर फोजदारी गुन्हे दाखल करा ; मंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख यांचे निवेदन

सोलापुरातील बिल्डर लॉबीने मनपाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने ‘नैसर्गीक शेळगी नाल्याची” वाट लावून लाखो रुपये खर्चून स्वप्नवत बांधलेल्या घरात पावसाळी पाण्याची लाट आणली याची सखोल चौकशी होणेबाबतचे निवेदन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी दिले आहे.

सोलापूर शहरांत जुना पुणे नाका येथे शेळगी कडून येणारा नाला पुणे नाका स्मशानभूमी,गणेश नगर,अवंती नगर,आर्यनंदी नगर,थोबडे नगर,अल्ली नगर,वसंत विहार,गुलमोहर सोसायटी,राधाकृष्ण कॉलनी आदीसह नवीन वसलेल्या नगरीतून शेळगी नाला वाहतो व पुढे १४ कमानी जवळ बाळे कडून येणाऱ्या नाल्यास मिळतो.

संग्रहित फोटो

पूर्वी शेळगी नाल्याच्या परिसरात दोन्ही बाजूने गवताची शेती होती तुरळक शेतवस्ती होत्या शेळगी ओढ्याचे (नाला) पात्र मोठे होते त्यावेळीही मोठी अतिवृष्टी झाली तरीही ते पावसाळी व ड्रेनेजचे पाणी पात्रातूनच वाहत देगाव ओढ्यास मिळत होते.

सद्यपरिस्थितीत या ओढ्याच्या दोन्ही बाजूस वसाहती व मोठमोठया वसाहतीसह शहरांतील नामवंत रुग्णालये उभारल्याने या ठिकाणी काँक्रीटीकरणांचे जंगल उभे झाले आहे.

सदर नाल्याच्या परिसरात अनेक बांधकामे निर्माण झाले सदरचे बांधकाम करतेवेळी नाल्यावर मुरुम टाकीत व बांधकामे करुन नाल्याचे पात्र कमी केलेले आहे.

सदर वसलेल्या नगरीचे ले-आऊट मंजूर करताना व बांधकाम परवाने मंजूर करताना महानगरपालिकेच्या त्यावेळच्या अधिकाऱ्यांनी पाहणी न करता व बेकायदेशीरपणे ले-आऊट मंजूर करुन बांधकाम परवाने दिले.

या वसलेल्या बेकायदेशीर वसाहती व बांधकामामुळे ओढ्याचे(नाला) पात्र अरुंद झाले व तसेच १४ कमानी व त्यापुढे देगावकडे जाणारा नाला हा वेळोवेळी साफ-सफाई व गाळ काढण्याचे कामे वेळेवर केली गेली नाहीत याकडे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने सदरील परिसरात अतिवृष्टीमुळे लाखो रुपये खर्चून स्वप्नवत बांधलेल्या घरात ड्रेनेज पाण्यासह पावसाळी पाणी शिरल्याने सदरील हजारों नागरिकांना रात्रभर जागरण करीत शहरांत असूनही शहरांशी संपर्क तुटला व येथील पाण्याचा निचरा करण्यासाठी तात्काळ कारवाई करण्यात आली नाही.

विशेष या नाल्याच्या बाजूला वसलेल्या नगरीत हजारो कुटुंबासह महानगरपालिकेतील अधिकारी वर्ग व मनपा सेवक वास्तव्यास आहेत.

निसर्गाच्या सानिध्याच्या शुद्ध वातावरणात अनेकांनी आपली जीवनाची पुंजी ही याठिकाणी स्वप्नवत घरे बांधून पूर्ण केली.
या ठिकाणी शहरांतील नामवंत रुग्णालये आहेत अश्या या आरोग्यनगरीत हजारों नागरिकांना या पुराच्या पाण्याने मानसिक त्रस्त झालेत व यांचे आरोग्यही धोक्यात आलेले आहे.

नागरी वस्ती निर्माण करताना बिल्डर लॉबीने महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या मदतीने सदर नैसर्गीक शेळगी नाल्याची रुंदी कमी करीत त्यांचा फायदा केला व स्वतःसाठीही मोठ्या जागा पदरात पाडल्या अशी शंका वर्तविली जात आहे.

आजच्या नैसर्गीक पुरपरिस्थितीला सदर बिल्डरसह तत्कालीन महानगरपालिकेचे अधिकारी जबाबदार आहेत. त्यांची सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई व्हावी, अशी सदर परिसरातील नागरिकांची मागणी आहे.
पुरुषोत्तम बरडे, जिल्हाप्रमुख