Big9news Network
पुणे – उरुळी कांचन (ता. हवेली) येथील गारवा हॉटेलचे मालक रामदास आखा़डे (वय- ४१ वर्षे) यांचा बुधवारी (ता. २०) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास पुण्यातील जहागिंर हॉस्पिटल मध्ये उपचारादरम्यान मृत्यु झाला. रामदास आखाडे यांच्यावर रविवारी (ता. १८) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास तलवारीने जीवघेणा हल्ला झाला होता. हल्ल्यानंतर रामदास आखाडे यांनी मृत्युशी दिलेली झुंज तब्बल बावन्न तासानंतर अपयशी ठरली. रामदास आखाडे यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी व दोन मुले असा परीवार आहे.
उपचारादरम्यान आखाडे यांची प्रकृती सातत्याने गंभीर होत चालली होती. यामुळे रामदास आखाडे यांना पुढील उपचारासाठी काल (मंगळवारी) दुपारी पुण्यातील जहांगिर या खासगी रुग्नालयात दाखल केले होते. मात्र रामदास आखाडे यांची मृत्युशी चाललेली झुज बावन्न तासानंतर अखेर बुधवारी पहाटे अपयशी ठरली.
तीन संशयित आरोपी ताब्यात
रामदास आखाडे यांच्यावर रविवारी झालेल्या हल्ल्यातील तीन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र या हल्ल्यामागील मास्टमाईंड अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. यामुळे हल्ल्याचे नेमके कारण समजु शकलेले नाही. मात्र प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीवरुन हा हल्ला व्यावसायिक स्पर्धेतुन झाला असण्याची शक्यता बळावली आहे. मात्र यामुळे हॉटेल व्यवसायिक ग्रुप मध्ये मोठी खळबळ माजली होती.