Big9 News
सोलापूर मराठी शरण साहित्य अभ्यासकांचा आणि वाचकांचा जिव्हाळ्याचा विषय ठरलेल्या तिसरे मराठी बसव साहित्य संमेलन शनिवार दि.8 एप्रिलपासून वाळवा तालुक्यातील नागाव येथे होत आहे. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस चालणार्या या मराठी बसव साहित्य संमेलनात बसव साहित्यासह वारकरी संत परंपरा, पुरोगामी वैचारिक चळवळ आदी विषयांवर चर्चासत्र, परिसंवाद, कविसंमेलन आणि सांस्कृतिक कार्यकमांची भरगच्च मेजवानी राहणार आहे.
शनिवारी सकाळी ग्रंथदिंडीने साहित्य संमेलनास प्रारंभ होईल. ज्येष्ठ स्त्रीवादी विचारवंत सुश्री गीताली वि.म.या संमेलनाध्यक्षा राहणार असून डॉ. तात्यासाहेब साळुंखे, अनिसच्या अध्यक्षा सरोजमाई पाटील, अॅड.के.डी.शिंदे आणि भालकीश्री डॉ.बसवलिंग पट्टद्देवरू यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. ज्येष्ठ कवी प्रा. राजा माळगी हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत.
या संमेलनात सोलापूरच्या डॉ.श्रुतीश्री .वडकबाळकर, वसुंधरा शर्मा, ज्ञानेश्वर बंडगर, लातूरचे डॉ.राजशेखर सोलापूरे यांचा विविध परिसंवादात सहभाग राहणार आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि परिवर्तनवादी लेखक रमजान दर्गा यांची प्रकट मुलाखत या संमेलनाचे आकर्षक ठरलणार आहे. ही मुलाखत धारवाडच्या शरण साहित्य अभ्यासक सविता नडकट्टी आणि सोलापूरचे चन्नवीर भद्रेश्वरमठ घेणार आहेत.
दोन दिवस चालणार्या या बसव साहित्य संमेलनात महाराष्ट्रसह देशभरातील मराठी अभ्यासक आणि साहित्य प्रेमींनी सहभागी व्हावे असे आवाहन नागाव ग्रामस्थांनी केले आहे.