मुंबई – विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी महत्वाची बातमी म्हणजे परीक्षा वेळापत्रक. कोरोना काळात नेमक्या कोणत्या तारखेस परीक्षा घेतल्या जातील त्याची उत्सुकता सगळ्यांनाच होती.
बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे तर दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे दरम्यान होणार आहे. महाराष्ट्र राज्य व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांतर्फे एप्रिल-मे 2021 मध्ये घेण्यात येणार्याक दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
यापूर्वी 16 फेब्रुवारीला संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. त्यावर संबंधित संघटना, शिक्षक, पालक, विद्यार्थी व शिक्षणतज्ज्ञांकडून सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यानंतर राज्य मंडळाने शुक्रवारी दहावी व बारावीचे संभाव्य वेळापत्रकच अंतिम केल्याचे जाहीर केले. त्यानुसार अंतिम वेळापत्रक राज्य मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांना कळवण्यात येणार असल्याचे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सांगितले.