Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

Big9 News

माध्यम क्रांतीच्या आजच्या युगात पारंपरिक माध्यमांपेक्षा प्रभावी मत परिवर्तक, व्हिडीओ ब्लॉगर्स व खासगी चॅनेल्सद्वारे निर्मित बातम्या व विश्लेषण पाहणाऱ्यांची संख्या वाढत आहे.  अपप्रचारांचा योग्य माहितीच्या आधारे सर्व माध्यमांतून मुकाबला करून राष्ट्रहित जपणे आवश्यक आहे. या दृष्टीने माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

विश्व संवाद केंद्र, मुंबईच्या वतीने देण्यात येणारे 22 वे ‘देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार’ राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते बुधवारी (दि. 3) राजभवन येथे समारंभपूर्वक देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.  राज्यपालांच्या हस्ते यावेळी मुद्रित, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल व समाजमाध्यम क्षेत्रातील 10 पत्रकारांना पुरस्कार प्रदान करण्यात आले

.

आपण 1978 मध्ये नगरसेवक झालो. तिथपासून आजपर्यंतच्या काळात माध्यम क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे. पूर्वी चहासोबत वृत्तपत्र वाचल्याशिवाय लोकांची दिवसाची सुरुवात होत नसे. आजच्या युगात देखील मुद्रित माध्यमांचे स्वतःचे असे वेगळे महत्त्व आहे, त्यामुळे मुद्रित माध्यमे संपणार नाहीत, असे सांगताना वृत्तपत्रे समकालीन घटनांचे अभिलेख असतात व पुढे त्याचेच रूपांतर इतिहासात  होते, असे राज्यपालांनी सांगितले.

ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर वापरल्या जाणाऱ्या अयोग्य भाषेबद्दल चिंता व्यक्त करून विद्यार्थी व युवकांच्या हाती योग्य व सुरक्षित मजकूर पडले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले. ‘सत्य एक असते व सुजाण लोक ते वेगवेगळ्या दृष्ट‍िने पाहतात’ या वचनाचा संदर्भ देताना आजकाल बातम्यांना अनेक रंगांची आवरणे असतात, त्यामुळे सत्य शोधणे कठीण जाते, अशी टिप्पणी राज्यपालांनी केली.

रत्नागिरी येथील ज्येष्ठ पत्रकार बालकृष्ण ऊर्फ प्रमोद कोनकर, दैनिक सकाळचे राजकीय प्रहसन लेखक प्रवीण टोकेकर, दीपक पळसुले, टाइम्स ऑफ इंडियाचे वैभव पुरंदरे, नीलेश खरे, जयंती वागधरे, यू ट्यूबर अनय जोगळेकर, लेखक अंशुल पांडे व समाज माध्यम क्षेत्रातील निनाद पाटील व हृषिकेश मगर यांना पुरस्कार देण्यात आले.

विश्व संवाद केंद्राने २५ व्या वर्षात पदार्पण केले असून आजवर ७४ पत्रकारांना सन्मानित केले असल्याचे अध्यक्ष सुधीर जोगळेकर यांनी सांगितले. विश्वस्त निशिथ भांडारकर यांनी प्रास्ताविक केले. अनय जोगळेकर व प्रवीण टोकेकर यांनी पुरस्कार विजेत्यांच्या वतीने सत्काराला उत्तर दिले. कार्यक्रमाला इस्रायलचे मुंबईतील वाणिज्य दूत कोब्बी शोशानी तसेच माध्यम क्षेत्रातील निमंत्रित उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *