Big9 News
वणिज्य क्षेत्रातील विद्यार्थ्यांना फक्त वाणिज्य क्षेत्रात संधी नसून आज उदयास आलेल्या नवनवीन उद्योग क्षेत्रात संधी उपलब्ध होत आहेत. उदा- फिनटेक त्यामुळे वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. आज 21 व्या शतकात लागणाऱ्या ज्ञान व कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात केल्यास कमी वेळेत विद्यार्थी यशाची नवनवीन शिखरे प्राप्त करू शकतात. विद्यार्थ्यांनी विद्यार्थी जीवनात स्वयंव्यवस्थापन व वेळ व्यवस्थापन करावे असे उदगार वरिष्ठ मानव संसाधन प्रशिक्षक एच सी एल लि पुणे मा.अजीम ढाले यांनी व्यक्त केले. हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्सच्या 49 व्या वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.यावेळी कस्तुरबाई अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अश्विन बोदार्डे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी कु. जान्वी तापडे हिच्या ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्राचार्य डॉ सत्यजित शहा यांनी महाविद्यालयाच्या कार्यावर प्रकाश टाकताना महाविद्यालयीन प्रगतीचा चढता आलेख आपल्या अहवालातून सादर केला.
समन्वयक सीए डॉ. सुनील इंगळे यांनी प्रास्ताविक केले डॉ.सुहास खंडाळे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन प्रा.अमोल क्षीरसागर आणि डॉ शमा काडादी यांनी केले. प्रा संदीप कस्तुरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
बक्षिस वितरण सोहळ्यात महाविद्यालयातील प्राध्यापक ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, गुणवंत विद्यार्थी, आणि त्यांचे पालक उपस्थित होते.
कु. मोनिका पाटील या विद्यार्थिनींने गायलेल्या पसायदानाने सोहळ्याची सांगता झाली.