Big9 News
संपूर्ण शहराला आता ४ दिवसाआड पाणी; पहाटे ४ ते दुपारी एक वाजेपर्यंत टप्पे; ‘झोन’ बाहेर लागणार वेळापत्रक
सत्ता असताना पाणी पुरवठा सुरळीत करता आला नाही, पण प्रशासकांच्या काळात सत्ताधारी व विरोधकांचा आवाज वाढला आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपांशिवाय महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने आता संपूर्ण शहराला चार दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे.
पहाटे चार ते दुपारी एक, या वेळेत तीन टप्प्यात वेगवेगळ्या भागाला पाणी पुरवठा केला जाणार आहे.
सन १९६९ मधील पाइपलाइन सुद्धा बदलली नाही टाकळी-सोरेगाव व तेथून पुढे सोलापूर शहरात येणारी पाण्याची पाइपलाइन तब्बल ५४ वर्षांपूर्वीची म्हणजेच सन १९६९ मध्ये टाकलेली आहे. आता सोलापूर शहराची लोकसंख्या दुप्पट-तिप्पट झाली, तरीसुद्धा त्याच पाईपलाईनमधून पाणी आणले जात आहे. तेव्हापासून महापालिकेने विकासकामांवर हजारो कोटींचा खर्च केला, पण भविष्याचा वेध घेऊन ती जुनाट पाइपलाइन बदलण्याचे धाडस कोणीच दाखवले नाहीं.
त्यामुळे ‘अंगापेक्षा भोंगाच जास्त’ अशी अवस्था त्याठिकाणी पाहायला मिळते. सतत गळती व पाइपलाइन फुटत असल्याने लाखो रुपयांचा चुराडा त्याच्या दुरुस्तीसाठी करावा लागला आहे.सण-उत्सवात बदलले नियोजनसध्या सण-उत्सवाचा काळ असून कडक उन्हाळा देखील जाणवू लागला आहे. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधींच्या भेटीनंतर पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण शहराला चार दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन केले.
बाळे, केगाव, देगाव, नवीपेठ, रामवाडी, सलगर वस्ती, बुधवार पेठ, रेल्वे लाईन, भवानी पेठ या संपूर्ण गावठाण भागाला तीन दिवसाआड आणि जुळे सोलापूरसह हद्दवाढ भागाला चार-पाच दिवसाआड पाणी दिले जात होते. ते बंद करून आता सर्वच भागाला टप्प्याटप्याने चार दिवसाआड प्रत्येकी तीन तास पाणी दिले जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.