मुंबई – मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आमरण उपोषण सुरु केले होते. अखेर आज राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर त्यांनी आपले उपोषण मागे घेतले.
राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी संभाजी राजे यांची आझाद मैदानात भेट घेऊन त्यांच्या मागण्या मान्य केल्याचं लेखी उत्तर दिलं. त्यानंतर संभाजीराजेंनी आपले उपोषण मागे घेतले.
संभाजीराजे म्हणाले, आरक्षण हा दीर्घकालीन लढा आहे. मला आनंदानं सांगायचंय की, ज्या मागण्या समोर ठेवल्या होत्या त्यातील काही मागण्या मान्य झाल्या आहेत. मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री वळसे पाटील, अमित देशमुख यांच्यासह इतर नेते इथे आले त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो.
राज्यसरकार इतकी तयारी करेल याची मला अपेक्षा नव्हती. मात्र, सरकारने जी तयारी केली ते पाहून भारावलो आहे. मराठा आरक्षणाचा प्रश सर्वोच्च न्यायालयात आहे हे माहित आहे. पण, जेथे जेथे माझी गरज बसेल तेथे राज्य सरकारला पूर्ण सहकार्य करेन मी सुद्धा तुमच्यासोबत असेन, अशी ग्वाही संभाजीराजे यांनी यावेळी दिली.
मराठा समाजाच्या कोणत्या मागण्या झाल्या मान्य?
- मराठा समाजातील युवकांना मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार.
- सार्थी संस्थेमध्ये रिक्त असणारी पदं 15 मार्च, 2022 पर्यंत भरणार.
- सार्थीचे व्हिजन डॉक्यूमेंटबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेऊन ३० जून, २०२२ पर्यंत त्याची पूर्तता करणार.
- सार्थी संस्थेच्या आठ उपकेंद्र उभारणीसाठी जमीन देण्याचा प्रस्ताव १५ मार्च, २०२२ पर्यंत मंत्रिमंडळापुढे ठेवला जाणार.
- आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला आणखी २० कोटी, तसेच पुरवणी मागणीद्वारे अतिरिक्त १०० कोटींचा निधी देणार (१०० कोटींपैकी ८० कोटी दिलेले आहेत)
- व्याज परताव्याबाबत कागदपंत्रांची पूर्तता करुन व्याज परतावा देणार