Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

MH13 News Network

सोलापूर – ( प्रतिनिधी ) – अक्कलकोट विधानसभा मतदार संघातील आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती गावाजवळील हरणी नदीवरील पुलासाठी शासनाकडून ७ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सोलापूर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या समस्येचे निवेदन देऊन तसेच पाठपुरावा करून पुलाची मागणी केली होती .त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी नुकत्याच झालेल्या अधिवेशनात हरणी नदीवरील पुलाच्या बांधकामासाठी ७ कोटी ७० लाख रुपये मंजूर केले असल्याची माहिती मुस्ती गावचे सरपंच नागराज पाटील यांनी दिली.


दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती गावची लोकसंख्या जवळपास ९ हजाराच्या आसपास आहे. या गावाजवळून १०० ते २०० मीटर अंतरावर हरणी नदी आहे. नदीच्या अलीकडे आणि पलीकडे लोकवस्ती आहे. तसेच शेतकऱ्यांची शेतीसुद्धा आहे. नदीच्या पलीकडे शेतकरी आणि नागरिकांना अलीकडे येता येत नव्हते. आणि मुस्ती गावच्या लोकांना नदीच्या पलीकडे जाता येत नव्हते. यासाठी असलेल्या एकमेव बंधाऱ्याचाच वापर होत होता. परंतु ऐन पावसाळ्यात या धोकादायक बंधाऱ्यावरूनच ग्रामस्थांना प्रवास करावा लागायचा. यामुळे दोघांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलनाच्या माध्यमातून पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे वेळोवेळी निवेदने देऊन हरणी नदीवर पुलाची मागणी केली होती. परंतु त्याला खूप वेळ लागत होता .मुस्ती गावचे सरपंच नागराज पाटील तसेच उपसरपंच रमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांची भेट घेऊन त्यांना पुलाच्या बांधकामासाठी निधीची मागणी केली होती. जिल्हाप्रमुख काळजे यांनीसुद्धा नागरिकांची समस्या आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तत्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून आणि वैयक्तिकरित्या पाठपुरावा करून मुख्यमंत्र्यांकडे निधीची मागणी लावून धरली होती. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुस्ती गावाजवळील हरणी नदीवर ७५ मीटर लांबीचा पूल बांधण्यासाठी सुमारे ७ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर केला. त्यानंतर मुस्ती ग्रामस्थांच्यावतीने जिल्हाप्रमुख काळजे यांचे आभार मानण्यात आले. आता लवकरच या कामाचे टेंडर निघून कामाला सुरुवात करण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल उचलणार असल्याचे सरपंच पाटील यांनी सांगितले.


———————————–
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे शक्य झाले !
———————————-
मुस्ती गावच्या लोकांची कित्येक वर्षापासूनची ही अडचण होती. याकडे कोणत्याही लोकप्रतिनिधीचे लक्ष गेले नाही. पावसाळ्यात बंधाऱ्यावरून धोकादायक प्रवास करताना काही नागरिक वाहून गेले आणि त्यांचा त्यामध्ये मृत्यू झाला होता. त्यानंतरसुद्धा प्रशासन जागे झाले नव्हते. अखेर आपण स्वतः या गावावरील संकट दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ₹कडे पाठपुरावा करून हरणी नदीवरील नवीन पुलासाठी साडेसात कोटी रुपये मंजूर करून आणले .पूल झाल्यानंतर मुस्ती आणि नदीच्या अलीकडील व पलीकडील नागरिकांचा कायमचा प्रश्न मिटणार असल्याचे जिल्हाप्रमुख मनीष काळजी यांनी सांगितले.
————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *