बसव जयंतीवरील खर्च कोरोनाग्रस्तांसाठी; बसव व्याख्यानमाला अन् उपक्रम रद्द

कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी बसव व्याख्यानमाला अन् बसव सप्ताह रद्द करण्यात आले आहे. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी घरातच जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या कार्याचे व विचारांचे स्मरण करून त्यांची जयंती साजरी करूया असे आवाहन वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांनी केले आहे. बसव जयंती उत्सवावर खर्च होणारी रक्कम कोरोनाग्रस्तांसाठी देणार असल्याची घोषणा बुरकुले यांनी केली.

बाराव्या शतकात जगाला समतेचा संदेश देणारे जगज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती यंदा 14 मे रोजी आहे. त्यानिमित्त वीरशैव व्हिजन उत्सव समितीच्या वतीने प्रतिवर्षी बसव व्याख्यानमाला आणि बसव सप्ताहाचे आयोजन करण्यात येते.

गेल्या पाच वर्षापासून प्रतीवर्षी बसवजयंती निमित्त तीन दिवसीय बसव व्याख्यानमाला घेण्यात येते. यंदा व्याख्यानमालेचे सातवे वर्ष होते. त्याचबरोबर बसव सप्ताह अंतर्गत एक आठवडाभर दररोज विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. यंदाही यावर होणारा खर्च कोरोनाग्रस्तांसाठी आणि लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या कुटुंबांना करण्यात येणार आहे. गेल्यावर्षी दीडशे गरीब व गरजू कुटुंबांना प्रत्येकी हजार रुपये असे एकूण दीड लाख रुपयांचे वाटप करण्यात आले होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वीरशैव व्हीजनच्या पदाधिकारी व कार्यकारणी सदस्य यांची ऑनलाईन बैठक घेण्यात आली. सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्व उत्सव व यात्रा आदींवर बंदी असल्यामुळे वीरशैव व्हिजनच्या पदाधिकारी व सदस्यांनी बसव व्याख्यानमाला व बसव सप्ताह रद्द करण्याचा निर्णय घेतला.

बसवप्रेमी नागरिकांनी 14 मे रोजी घरातच बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करावे तसेच त्यांच्या विचारांचे व कार्याचे स्मरण करावे. कोरोनाचे संकट दूर करण्याचे साकडे घालावे. तसेच जयंतीदिनी कोंतम चौक येथील महात्मा बसवेश्वर यांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी कोणीही येऊ नये असे आवाहन केले आहे.

यावेळी उत्सव समिती अध्यक्ष सोमेश्वर याबाजी, युवक आघाडी अध्यक्ष विजयकुमार हेले, सिद्धाराम बिराजदार, नागेश बडदाळ, संजय साखरे, आनंद दुलंगे, विजयकुमार बिराजदार, राजेश नीला, व्याख्यानमाला प्रमुख मलकप्‍पा बणजगोळे, चिदानंद मुस्तारे, बसवराज चाकाई, संगमेश कंटी, अमित कलशेट्टी, शिव कलशेट्टी, सोमनाथ चौधरी, अविनाश हत्तरकी, धानेश सावळगी, सचिन विभुते, चेतन लिगाडे, बसवराज जमखंडी आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी व्यक्ती आणि समाजाच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले होते. त्यांनी दिलेल्या शिकवणुकीप्रमाणे समाजाची सेवा ‘दासोह सेवा’ समजून समाजसेवेचा भाव वीरशैव व्हीजनने जोपासला आहे. गतवर्षी गरीब व गरजू कुटुंबांना दीड लाख रुपये वाटप करण्यात आले.

राजशेखर बुरकुले
संस्थापक अध्यक्ष
वीरशैव व्हीजन