मुंबई : अमरावतीचे राणा दाम्पत्य (NAVNEET RANA, RAVI RANA)राजद्रोहाच्या आरोपाखाली सध्या तुरुंगात आहे. दरम्यान, आज त्यांच्या भवितव्याचा निर्णय होणार आहे. या दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी होणार आहे. शनिवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाकडून निकाल राखून ठेवण्यात आला होता. त्यावरच आज फैसला होणार आहे.
मुंबई सत्र न्यायालय आमदार रवी राणा (RAVI RANA ) आणि खासदार नवनीत राणा यांच्या जामीन अर्जावर आज आपला निकाल जाहीर करणार आहेत. शनिवारी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता. दरम्यान, आमदार रवी राणा यांच्याविरोधात 17, तर खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात 6 गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे सरकारी वकिलांकडून राणा दाम्पत्याच्या जामिनाला विरोध करण्यात आला आहे.
राज्य सरकारने जामीन याचिकेला उत्तर देताना राणा दाम्पत्याच्या जामीनाला जोरदार विरोध केला आहे. राजद्रोहासारखा गंभीर गुन्हा दाखल असल्याने आणि त्यांच्याविरोधात यापूर्वीही विविध पोलीस स्थानकांत इनेक गुन्हे दाखल असल्याने त्यांना जामीन देण्यात येऊ नये, तसेच जामीनावर बाहेर आल्यानंतरही तेढ निर्माण करणारी किंवा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारी वक्तव्य त्यांच्याकडून केली जाऊ शकतात, असे न्यायालयात सांगण्यात आले आहे.
तसेच, खासदार नवनीत राणा यांचा विशेष उल्लेखही राज्य सरकारकडून या उत्तरात करण्यात आला आहे. नवनीत राणा यांच्याविरोधात खोटं जात प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच, मुलुंड पोलीस स्थानकातही गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या दाम्पत्याला जामीन देऊ नये, असे म्हणत राज्य सरकारने आपले उत्तर दाखल केले आहे.