Big9 News
मुंबई, दि. २८ प्रशासनात काम करताना सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याबरोबरच त्याचे समाधान करणे आवश्यक आहे. प्रत्येकाने ही भावना लक्षात ठेवून आपले कर्तव्य पार पाडावे, असे प्रतिपादन मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी व्यक्त केले.
सामान्य प्रशासन विभाग व महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांचा कार्यगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मनोगत व्यक्त करतांना श्री. श्रीवास्तव बोलत होते. या कार्यक्रमास वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे मुख्य सल्लागार ग. दि.कुलथे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
श्री.श्रीवास्तव म्हणाले की, राज्यात 1987 ला आलो तेव्हा एकाही व्यक्तीचा परिचय नव्हता. या सेवेमुळे मला मराठी भाषा शिकता आली, त्यामुळे अनेक मित्र आणि शुभचिंतकाशी जोडला गेलो. प्रशासनात काम करताना कामानिमित्त अनेक अधिकाऱ्यांबरोबर काम करण्याची संधी मिळाली व त्यातून अनेकांशी ऋणानुबंध तयार झाले. माझ्या व्यक्तिमत्त्वावर वडीलांचा प्रभाव आहे. प्रशासनात चांगले वाईट लोक संपर्कात येतील. अशा प्रत्येक प्रसंगात स्थिर आणि शांत राहण्यातच स्वतःचे कौशल्य आहे, तसेच सर्वसामान्य माणसाच्या कामाला नेहमी प्राधान्य दिले गेले पाहिजे, ही वडिलांची शिकवण सेवेत पाळली, सर्वांशी चांगले संबंध जोपासले. मुख्य सचिव म्हणजे कुटुंबप्रमुख म्हणून काम करताना प्रशासन आणि जनतेतून सहकार्य मिळाल्याने यशस्वी काम करू शकलो, असे त्यांनी सांगितले.