Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

Trend | या मत मागायला..! मग सांगतो..!! जुना प्रभाग 5 मध्ये घुमलं वारं..

पुणे रोडवरील सोलापूरचे प्रवेशद्वार समजलं जाणार बाळे गावात ‘एका पेक्षा एक ‘ विकास कामांचा धडाका माजी नगरसेवकांनी आणि राजकीय पुढारीने सुरू केला होता. प्रशासक नेमल्यापासून राजकीय पुढारी ‘निवांत’ आहेत. या भागातील राजेश्वरी नगर भागात उखडलेला रस्ता,चिखल, माती, पीव्हीसी नळाची पाईपलाईन आणि त्यात भरीस भर म्हणजे बंद केलेली की पडलेली.? स्ट्रीट लाईट.. एकमेकावर कुरघोडी करण्याच्या नादात येथील विकासकामांना खिळ घातली जात आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी या मत मागायला..! मग सांगतो असा व्हाट्सअपवर Trend सुरू केला आहे.

प्रभाग पाच मध्ये माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी, माजी नगरसेविका ज्योती बमगोंडे,स्वाती हावळे हे पॅनल निवडून आलं. त्यानंतर आनंद चंदनशिवे आणि गणेश पुजारी यांनी माजी पालकमंत्री दत्ता भरणे यांच्या माध्यमातून अक्षरशः कोट्यवधी रुपयांची कामे सुरू केली. प्रभागातील नागरिकांशी रोजच्या भेटीगाठी, एका कॉल वर सुद्धा काम यामुळे या दोघांच्या नावाची चर्चा या भागात मोठ्या प्रमाणावर आहे. दोन्ही माजी नगरसेविकांनी आपल्या पतीदेवांच्या माध्यमातून महिला सबलीकरण, प्रभागातील कामे करण्याचा चांगलाच प्रयत्न केला आहे. परंतु प्रशासक नेमल्यापासून अधिकाऱ्यांकडून काम करून घ्यायला ही मंडळी कमी पडत असल्याची चर्चा रंगत आहे.
राजेश्वरी नगर भाग हा हॉट स्पॉट असून हा भाग भाजपाचा गड समजला जातो. प्रभाग पाच हा उत्तर मध्ये येत असल्याने गेल्या पंधरा वर्षापासून भाजपचे विद्यमान आमदार माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचा हा बालेकिल्ला समजला जातो. तरीही या भागात आवश्यक अशी विकासकामे झाली नसल्याने नागरिकांमध्ये मोठी नाराजी आहे. आमदार भाजपाचा तर नगरसेवक दुसऱ्या पक्षाचा असे येथे घट्ट समीकरण बनले आहे.

बुजलेली बोअरवेल
बोअरवेल काम सुरू करताना

याच भागातील स्ट्रीट लाईट वरून राजकारण तापले आहे. स्ट्रीट लाईट बंद झाल्याने भाजपाला सोडचिठ्ठी दिलेले राष्ट्रवादीवासी बिज्जू प्रधाने यांनी पाठपुरावा करून लाईट सुरु करून घेतली. परंतु गेल्या चार महिन्यापासून येथे विजेचा लपंडाव सुरू आहे. या आधी गणेश पुजारी यांनी अनेकदा येथील लाईट सुरू केल्या होत्या.

राजेश्वरी नगर भागात पिण्याच्या पाईपलाईनचे काम गेल्या काही वर्षापासून खडलेले आहे. विकासाच्या बाबत या भागात मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष असून अद्यापही PVC प्लास्टिकच्या पिण्याची पाईपलाईन असून रस्ता अनेक ठिकाणी उखडलेला आहे. या ठिकाणाहून जाताना अनेकजण चिखलात पडलेले आहेत तर चार चाकी वाहन आत येऊ शकत नाही. दुचाकी धारकांना गाडीवरून जाताना मोठी कसरत करावी लागते. या ठिकाणी चालताना लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि स्त्रियांची अवस्था मोठी बिकट होत आहे. महापालिकेने याकडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. पाणी आणि चिखल रस्त्याशेजारी घरांमध्ये जात असल्याने या भागातील महिला वैतागलेल्या आहेत.


दरम्यान रस्त्याची झालेली चाळण, पूर्ण उखडलेला रस्ता,पावसात पायवाट सुद्धा दिसत नाही इतका चिखल,पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, देखाव्यासाठी केलेली बोअरवेल, आधी पाईपलाईन नंतर रस्ता पण होणार कधी या प्रश्नांमुळे त्रस्त रहिवासी, त्यातच अंधार करून राजकारण खेळले जात असल्याची चर्चा सुरू आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *