Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

३६ जिल्हे, ४ हजार किलोमिटरचा प्रवास: करमाळ्यात झाले स्वागत
१९ सप्टेंबरपासून मुंबईतील नाहूर येथून सुरुवात
सोलापूर :  देशाचे संरक्षण करताना गेल्या काही वर्षांत दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि कोरोनाच्या काळात काम करणाऱ्या डॉक्टर, नर्स, पोलीस इत्यादी कोरोना योद्ध्यांना सलाम करण्यासाठी एका युवकाने सायकलवरून महाराष्ट्र प्रदक्षिणा सुरू केली आहे. अजित पांडुरंग दळवी असं या तरुणाच नाव असून, तो सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात आल्यानंतर स्थानिक लोकांनी त्याचे स्वागत केले.
अजित दळवी हा २६ वर्षीय युवक कोल्हापूर जिल्ह्यातील कोदेबुद्रूक, ता. गगनबावडा इथल्या गावचा आहे. त्याने १९ सप्टेंबरपासून मुंबईतील नाहूर येथून सायकलिंगला सुरुवात केली. या मोहिमेसाठी महाराष्ट्रातील संपूर्ण ३६ जिल्ह्यात प्रवास करणार आहे. त्याने सध्या ३४ जिल्ह्यांचा प्रवास पूर्ण केला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन जिल्ह्याचा प्रवास राहिला आहे.
मुंबईहून सुरू झालेला सायकलवरचा चार हजार किलोमीटरचा प्रवास सिंधुदूर्गला थांबणार आहे. साधारण १३ ऑक्टोबरपर्यंत प्रवास चालेल.
मुंबईतील उद्योजक केएम सुरेश यांच्याकडून प्रेरणा घेत सायकलने महाराष्ट्र भ्रमंती करण्याची मोहिम हाती घेतली आहे.
सायकलिस्ट ग्रुप सदस्य, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी या तरुणाचे या प्रवासादरम्यान प्रत्येक ठिकाणी मुक्काम रात्रीच्या जेवणाची सोय केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात गेल्यानंतर तेथे अधिकार्‍यांना भेटून तो पुढे निघतो. त्या-त्या जिल्ह्याच्या विश्रामगृहात मुक्काम करतो.
यापूर्वीही त्याने मुंबई ते कोल्हापूर असा साडेचारशे किलोमीटरचा पहिला सायकल प्रवास केला होता. त्यानंतर मुंबई – गणपतीपुळे – कोल्हापूर असा सुमारे साडेपाचशे किलोमीटरचा प्रवास केला. पुढच्या १२०० किलोमीटरच्या टप्प्यात मुंबई – पंढरपूर – तुळजापूर – अक्कलकोट – गाणगापूर – विजयपूर (कर्नाटक) आणि कोल्हापूर असा प्रवास सायकलवर केला होता.
सध्या अजित आयटीआयमधून वेल्डरचं प्रशिक्षण घेऊन मुंबईत माझगाव डॉक सीक बिल्डर लि. कंपनीत तो नोकरी करतोय. तो गेल्या चार वर्षांपासून सायकल चालवत आहे. सायकलिंगच्या आवड़ीमुळे सुरवातीला मुंबईत सायकलवरून फेरफटका मारत असे. नंतर के.एम.सुरेश यांच्या संपर्कात आल्याने त्य‍ाला सायकलिंगची आवड निर्माण झाली
उद्योजकाने दिली सायकल भेट
या प्रवासासाठी अत्याधुनिक गिअरची सायकल एका उद्योजकाने दिली आहे. या मोहिमेसाठी ही सायकल कामी येत आहे. अजित दररोज तो ११ तास सायकलिंग करतो. सकाळी सहा वाजता सायकलिंगला सुरुवात करतो. दुपारी पर्यंत शंभर किलोमीटर चालवितो. त्यानंतर दुपारी जेवण आणि थोडी विश्रांती घेऊन पुन्हा शंभर किलोमीटर सायकल चालवत आहे.
निरोगी आयुष्यासाठी सायकल चालवा
शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि  कोरोना योद्ध्यांना सलाम करण्यासाठी सायकलवरून महाराष्ट्र प्रदक्षिणा सुरू केली आहे. सायकलिंगमुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. चांगल्या आरोग्यासाठी युवकांनी सायकलिंग करावे. जळगावचे जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी या मोहीमेसाठी मदत केली. वेळोवेळी त्यांच्याशी संपर्कात असतो, असेही अजितने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *