Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

मुलीच्या पहिल्या वाढदिवसाला वडापाव मिळतो ‘मोफत

अजय यांचा स्तुत्य उपक्रम; व्यवसायाला दिली सामाजिकतेची जोड

सोलापूर : संपूर्ण जगामध्ये भारत हा असा एकमेव देश आहे की, जिथे स्त्रियांना देवासमान मानले जाते. स्त्रिच्या अंगी असणार्‍या स्त्रित्वामुळे ती प्रेमळ आई बनून भावी पिढीला पर्यायाने आदर्शमाता बनविण्याचे कार्य करते. पण हे काय? देशाला मातेचा दर्जा देणार्‍या या देशातच ‘स्त्रीभ्रूण हत्यारूपी‘ राक्षस देशाला गिळायला निघाला आहे. आज कितीतरी निरागस बालिकांना हे जग पाहाण्यापूर्वीच जगाचा निरोप घ्यावा लागत आहे. हे कुठंतरी थांबावं यासाठी सोलापुरातील एका अवलीयाने व्यवसायाच्या माध्यामातून ‘बेटी बचाव’ अभियान सुरु केले आहे.

अजय अशोक अवचारे असं त्यांच नाव असून ते शहरातील कुमठा नाका परिसरात राहतात. ४१ वर्षीय अजय हे डिप्लोमा इन अॅटोमोबाईलचे शिक्षण घेतल्यानंतर अॅटोमोबाईलचे घराजवळ दुकान सुरु केले. हे दुकान सुरु असताना त्यांच्या चुलत भावाने त्यांना वडापावचा गाडा सुरु करण्याची भन्नाट अायडिया सुचवली. कुमठा नाका परिसरात श्रमजीवी कामगार लोक जास्त अाहे. कमी पैश्यात लोकांचे पोट भरता यावे अश्या किंमतीत सन २०११ मध्ये वडापावचा गाडा सुरु केला.

अजय अवचारे

दहा रुपयास चार वडापाव देण्यास सुरुवात केली. पाहता पाहता वडापावची महती सर्वदूर पोहचली. खमंग वडापावची मागणी वाढली. हा वडापाव खाण्यासाठी कुंभारी, मुळेगाव,अक्कलकोट, दोड्डी, दनाळी या शहरानजीकच्या अनेक गावातील लोक येऊ लागले. स्वस्तात मिळणार्‍या वडापावमधून लोकांची भूक तर भागली, पण समाजासाठी आणखीन काहीतरी करण्याची इच्छा होती. दरम्यान, मुलींचा जन्मदर कमी होत असल्याने बेटी बचावसाठी काम करण्याचे ठरवले.

श्री. अवचारे यांनी त्यांच्या वडापाव दुकानात ‘बेटी बचाव’ या संदेशाचा फलक लावला. वडापाव खाण्यासाठी आलेल्या ग्राहकाचे हा फलक लक्ष वेधून घेतो. एकाच मुलीवर कुटुंब नियोजन केलेल्या दाम्पत्याच्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाला 51 वडापाव मोफत तर दोन मुलींवर कुटुंब नियोजन करणाऱ्या दाम्पत्याच्या मुलीच्या पहिल्या वाढदिवशी एक वडापाव वर एक वडापाव मोफत, अशी योजना सुरू केली. गेल्या सहा वर्षात आतापर्यंत १०५८ जणांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

‘बेटी बचाव’ या अभिनव योजनेला समाजातील सर्व स्थरावर  पाठिंबा अाणि कौतुक होऊ लागले. सध्यस्थितीत लक्ष्मी पुणेरी वडापावचा हा गाडा दिवसभर सुरू असतो. या कामात त्यांच्या घरातील सर्व सदस्य मदत करतात, शिवाय आठ कामगारही काम करत असतात.

प्रत्येक दिवशी ४ हजारपेक्षा जास्त वडापाव विकले जातात. वडापावसाठी लागणारे बेसन पीठ आणि पाव हे स्वतःच्या घरीच तयार केले जाते. तसेच फिल्टर केलेले शुद्ध पाणी देखील वापरले जाते. स्वच्छता पूर्णतः कटाक्षपणे पाळले जाते. कोरोनामुळे महागाई वाढल्याने अाज दहा रुपयात तीन वडापाव विकले जातात. भविष्यात वडापावच्या किंमती याच राहणार असल्याचे श्री. अवचारे यांनी सांगितले.

एकाच अपत्यानंतर केली कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया

विशेष म्हणजे श्री. अवचारे यांना वीणा नावाची एकुलती एक मुलगी आहे. एकाच अपत्यानंतर अवचारे यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करुन ‘बेटी बचाव’ या योजनेची अंमलबजावणी स्वतःपासून केली आहे. श्री अवचारे यांचे वडील अशोक हे
भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील सेवा निवृत्त कर्मचारी आहेत. तर आई सुनंदा या निवृत्त शिक्षिका आहेत. पत्नी वैशाली या देखील अध्यापनाचे कार्य करतात. तर त्यांचा लहान भाऊ अलकेश मुख्याध्यापक अाहेत. हे सर्वजण या उपक्रमाला सहकार्य करत असतात.

मुलगी वाचविणे ही नैतिक जबाबदारी

अजय अवचारे सांगतात की, “आज स्त्रीयांच्या जन्मप्रमाणात कृत्रिम रित्या घट होत आहे. त्यामुळे जीवनचक्र ढासळल्याचे दिसून येते. भारत देशाचा एक जागरूक नागरिक या नात्याने या देशातील प्रत्येक मुलगी वाचविणे ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी बनली आहे. ‘बेटी बचाव’ या अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. समाजाने आपली  सामाजिक बांधिलकी जपल्यास स्त्री हत्या हद्दपार होण्यास विलंब लागणार नाही.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *