बिहारचे गुंड दक्षिण सोलापुरात सापडले… पहा

Big9news Network

पत्नी मुंबईहून माहेरी आली आणि तिला भेटायला आलेल्या नवऱ्यासह दोन सराईत गुन्हेगारांना वळसंग पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. या दोन्ही गुन्हेगारावर मुंबई परिसरात ५० पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मूळचा बिहारचा अभिषेक अशोक कुमार (वय २९, मालवणी, मालाड) याची पत्नी आषाढ पाहण्यासाठी माहेरी हणमगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथे आली होती. तिला भेटण्यासाठी अभिषेक हा त्याचा साथीदार विनोद अशोक पवार (वय ४४, मालवणी, मालाड) याला घेऊन हनमगावला आला होता. नवघर पोलीस ठाण्याला ही माहिती आणि संशयिताचे फोटो मिळाले. त्यांनी वळसंग पोलीस ठाण्याला कळवताच एक फौजदार आणि दोन पोलिसांनी हणमगाव येथून शिताफीने दोघांना ताब्यात घेतले.

नवघर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन बेंद्रे यांच्याकडे दोन्ही सराईतांना सोपविण्यात आले. या दोघांवर कारची काच फोडून कारटेप, लॅपटॉप, महागड्या वस्तू चोरल्याचे वसई-विरार, मीरा-भाईंदर, पुणे आदी ठिकाणी २२ गुन्हे दाखल आहेत. याशिवाय २८ ते ३० अन्य गुन्ह्यात दोघे पोलिसांना हवे होते. वळसंग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले आणि नवघरचे सपोनि नितीन बेद्रे यांच्यात दोन दिवस योग्य समन्वय साधण्यात आला होता.