अष्टविनायक | मोरगावचा मयूरेश्र्वर 

Big9news Network

पुण्यापासून ५५ किमी अंतरावर असलेल्या पुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्यातील मोरगांव या गावी कऱ्हा नदीच्या काठावर श्री मयुरेश्वर मंदिर स्थित आहे. या परिसराला ‘भूस्वनंदा’ या नांवानेसुद्धा ओळखले जाते. मोरगांव याचा शब्दशः अर्थ मोरांचे गांव असा आहे. कोणे एके काळी या गांवाचा आकार हा मोराप्रमाणे तर होताच शिवाय येथे भरपूर प्रमाणात मोरांची वस्ती होती. म्हणून या गांवाला मोरगांव म्हटले जाते. अष्टविनायक तीर्थयात्रेची सुरुवात ही या मंदिराच्या दर्शनाने केली जाते.

अष्टविनायकातील सर्वांत पहिला गणपती म्हणून मोरगावचा मयूरेश्वर ओळखला जातो.

येथील मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आले असन ते बहमनी काळात बांधले गेले. गावाच्या मध्यभागी असलेल्या या देवळाला चारही बाजूंनी मनोरे आहेत.
मुघल काळात देवळावर आक्रमण होऊ नये म्हणून या देवळाला मशिदीसारखा आकार दिला आहे.
देवळाच्या बाजूने ५० फुट उंचीची संरक्षण भिंत आहे.

  • श्री मयुरेश्वरची कथा :

आख्यायिकेनुसार मिथिला येथील गंडकी नगरीचा राजा चक्रपाणी राज्य करीत होता. तो आणि त्याची राणी उग्रा हे मुल नसल्यामुळे दुःखी होते. त्या दोघांनी सूर्याची उपासना केली आणि आशीर्वादस्वरूप राणीला दिवस गेले. परंतु त्या गर्भाचे तेज आणि प्रभा राणी सहन करू शकली नाही आणि तिने त्या गर्भाला समुद्रात सोडून दिले. त्यातून एका तेजस्वी पुत्राचा जन्म झाला. ब्राम्हणाच्या रुपात समुद्राने त्या मुलाला राजाच्या हवाली केले. समुद्रात जन्म पावल्याने राजाने आपल्या मुलाचे नाव सिंधू ठेवले. सूर्याची उपासना करणारा हा सिंधू जस जसा मोठा होत गेला तसतसा तो अधिकाधिक बलशाली होऊ लागला. सिंधूवर प्रसन्न होऊन सूर्याने त्याला वरदान म्हणून अमृत देऊ केले आणि आशीर्वाद दिला की जोपर्यंत हे अमृत त्याच्या नाभीमध्ये आहे तोपर्यंत त्याचा मृत्यू होणार नाही. अमरत्वाचा वर प्राप्त झाल्यावर सिंधूने इंद्र आदि देवांवर आक्रमण केले. त्याने सर्व देवांचा पराभव केला आणि त्यांना आपल्या तुरुंगात डांबले. मग उरलेल्या देवांनी गणपतीची प्रार्थना केली आणि त्याला असुर राजा सिंधूपासून त्यांना वाचवण्याची विनंती केली. त्यांच्या प्रार्थनांनी प्रसन्न होऊन गणपतीने त्रेतायुगात पार्वतीचा पुत्र म्हणून जन्म घेऊन सिंधू राक्षसाला ठार मारले. यासाठी गणपती मोरावर आरूढ होऊन पृथ्वीवर अवतीर्ण झाला आणि याचठिकाणी सिंधूचे मुंडके पडले.

  • श्री मोरेश्वर मंदिर आणि परिसर :

या मंदिरात मयूरेश्र्वराबरोबर रिद्धी व सिध्दी यांच्याही मूर्ती आहेत.
असे म्हणतात की ब्रम्हदेवाने दोन वेळा या मयूरेश्र्वराची मूर्ती बनवली आहे.
पहिली मूर्ती बनवल्यावर ती सिंधूसूराने तोडली. म्हणून ब्रम्हदेवाने पुन्हा एक मूर्ती घडवली.

सध्याची मयूरेश्र्वराची मूर्ती खरी नसून त्यामागे खरी मूर्ती असल्याचे मानले जाते. ती मूर्ती लहान वाळू व लोखंडाचे अंश व हिर्यांपासून बनलेली आहे. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या समोर एक नंदीची मूर्ती आहे.

असे सांगितले जाते की शंकराच्या मंदिरासाठी नंदीची मूर्ती एका रथातून नेली जात होती, मात्र येथे आल्यावर त्या रथाचे चाक तुटले. त्यामुळे या नंदीला येथेच ठेवण्यात आले.

  • श्री मोरेश्वर पूजा आणि उत्सव :

सकाळी ५ वाजता प्रक्षाल पूजा (गणपतीचे स्नान), सकाळी ७ वाजता शोडपचार पूजा, दुअपारी १२ वाजता दुसरी शोडपचार पूजा, रात्री ८ वाजता पंचोपचार पूजा आणि रात्री १० वाजता शेजारती केली जाते.

मुख्य गणेश मूर्तीची पूजा दररोज सकाळी ७, दुपारी १२ आणि रात्री ८ वाजता केली जाते. माघ शुक्ल चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी या दोन दिवशी भक्त मोठ्या प्रमाणावर मयुरेश्वराचे दर्शन घेण्यास गर्दी करतात. या दोन्ही दिवशी चिंचवड येथे संत मोरया गोसावी यांनी स्थापिलेल्या मंगलमुर्ती मंदिरातून भक्तगण पालखी घेऊन येतात. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या दहा दिवसात मयूरेश्वराच्या मंदिरात जत्रा भरते. विजयादशमी आणि सोमवती अमावस्या हे दिवससुद्धा साजरे केले जातात.

  • जाण्याचा मार्ग :

हे मंदिर पुण्यापासून अंदाजे ६४ किलोमीटरवर असून कर्हा नदीजवळ आहे.पुणे लोणी चौफुला करत आपण मोरगावला जाऊ शकतो.पावसाळ्यात येथे मोर बघायला मिळतात

पुणे आणि सर्व अष्टविनायक मंदिरे यादरम्यान राज्य परिवहन मंडळाच्या विशेष बस जातात. खासगी टूर कंपन्यासुद्धा या टूर्स आयोजित करतात. भक्तांना राहण्यासाठी सर्व मंदिरांच्या ठिकाणी धर्मशाळा, हॉटेल आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ याचे रिसोर्ट उपलब्ध आहेत.

  • जवळची इतर दर्शनीय स्थळे :

पांडवांनी बांधलेले पांडेश्वर मंदिर. अंतर अंदाजे १२ किमी
जेजुरीचे श्री मल्हारी मार्तंड खंडोबाचे देऊळ. अंतर अंदाजे १७ किमी
जेजुरीपासून दोन किमी अंतरावर लवथळेश्वर हे शिवमंदिर. अंतर अंदाजे १९ किमी
सासवड येथीर संत सोपान महाराज यांची समाधी. अंतर अंदाजे ३४ किमी
नारायणपूर येथील एकमुखी दत्ताचे मंदिर, शिवमंदिर, बालाजी मंदिर आणि पुरंदर किल्ला. अंतर अंदाजे ४२ किमी

॥वक्रतुंड महाकाय सुर्य कोटी समप्रभ॥
॥निर्विघ्नं कुरुम देवे सर्व कार्येशु सर्वदा॥

||गणपती बाप्पा मोरया||

All Rights Reserved
© ✍ लेखन / माहिती

संकलन : रमेश साहेबराव जाधव.
संग्रहित दिनांक : १६ सप्टेंबर २०१५

ॐ नम: शिवाय, ॐ नमो नारायण ॥
॥ जय श्रीराम, जय श्रीकृष्ण….