लोककल्याणकारी योध्दा म्हणूनच अर्जुन नरोत्तम – विवेक घळसासी

Big9news Network

शुध्द आचरण, एकाग्रता, परिपूर्ण समर्पण असे सर्वगुण अर्जुनामध्ये होते त्यामुळेच अर्जुन नरोत्तम आहे. असे प्रतिपादन अमृतवक्ते विवेकजी घळसासी यांनी केले. समर्थ सहकारी बँकेच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाच्या निमित्ताने महाभारत या विषयावर तीन दिवस वाग्यज्ञाचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये पहिल्या दिवशी नरोत्तम पार्थ यातून अर्जुनाच्या विविध गुणांची आणि पराक्रमांची महती त्यांनी सांगितली.

अर्जुन नर तर कृष्ण नारायण आहे. नर म्हणजेच नरोत्तम. अर्जुनामध्ये क्षमाशीलता हा गुण महत्वाचा होता त्याचबरोबर तो ज्ञानी होता. कोणाचाही मत्सर किंवा द्वेष करीत नव्हता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तो सावध आणि दक्ष होता. अर्जुनामध्ये कायम विद्यार्थीवृत्ती होती. महाभारतामध्ये असलेले महत्वाचे पात्र म्हणजे श्रीकृष्ण, अर्जुन आणि द्रौपदी हे तिघे सावळे होते. आणि सावळेपणा हा निर्मितीची अद्भुत क्षमता असते. अर्जुन सर्वश्रेष्ठ होता. त्यातूनच तो नरोत्तम पार्थ होता. नरोत्तम होण्यासाठी अर्जुनासारखे गुण आपल्यात येण्यासाठी आजच्या पिढीने आपले राष्ट्रीय ग्रंथ अभ्यासले पाहिजेत. समाजाला वैभवाला जायचे असेल तर राष्ट्रीय ग्रंथ प्रत्येकाने वाचले पाहिजे. असेही विवेकजी घळसासी यांनी आपल्या अमृतवाणीतून सांगितले.

प्रारंभी समर्थ बँकेचे संस्थापक तसेच विद्यमान संचालक पंचांगकर्ते मोहन दाते यांनी प्रास्ताविकातून बँकेच्या वाटचालीचा आढावा घेतला. त्यानंतर बँकेचे हितचिंतक आणि जुने खातेदार डॉ. शिरीष वळसंगकर, उद्योजक पुरूषोत्तम धूत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर बँकेच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचे आणि अमृतवक्ते विवेकजी घळसासी यांचा शाल पुष्पहार देवून स्वागत करण्यात आले. यावेळी बँकेचे अध्यक्ष दिलीप अत्रे, उपाध्यक्ष राजन जांभोटकर, संचालक श्रीनिवास कुमठेकर, अॅड श्रीकृष्ण कालेकर, रमेश कोल्हापुरे, प्रशांत बडवे आदी उपस्थित होते. त्यानंतर माझ्या अडचणीच्या काळात समर्थ बँक माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिल्याचे डॉ. शिरीष वळसंगकर यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत बडवे यांनी केले. मंगळवार दि. 19 ऑक्टोंबर रोजी वाग्यज्ञाचा दुसरा दिवस असून पितामह भीष्म यांच्यावर आणि तिसऱ्या दिवशी बुधवार दि. 20 ऑ्नटोंबर रोजी महानायक श्रीकृष्ण यांच्यावर वाग्यज्ञ होणार आहे.

समर्थ सहकारी बँकेच्या रौप्यमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित वाग्यज्ञाचा शुभारंभ बँकेचे जुने खातेदार डॉ. शिरीष वळसंगकर, उद्योजक पुरूषोत्तम धूत यांनी केला. यावेळी बँकेचे अध्यक्ष दिलीप अत्रे, उपाध्यक्ष राजन जांभोटकर, संचालक श्रीनिवास कुमठेकर, अॅड श्रीकृष्ण कालेकर, मोहन दाते, रमेश कोल्हापुरे, प्रशांत बडवे आदी.