Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

महिला बालविकास विभाग आणि युनिसेफच्या वतीने सातवी ते दहावी मधील मुलींना “मासिक पाळी” विषयक जनजागृतीसाठी शाळेत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या शेवटी झाकल्या हातात सॅनिटरी नॅपकीन्सचे पॅकेट घेऊन बाहेर पडणाऱ्या त्या मुलींना योगायोगाने पाचवीतल्या ईशान नावाच्या विद्यार्थ्याने बघितले.
“मॅडम त्या मुली काय घेऊन जात आहेत ?” कुतूहल म्हणून विचारलेल्या त्याच्या प्रश्नाला उत्तर द्यायचे मुद्दाम टाळणे मला योग्य वाटले नाही. अर्थात पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला पाळी, पिरियड्स, महावारी या मुदयांबद्दल मी शिक्षक म्हणून नेमके काय सांगावे ? या विचारात असतानाच ईशानने माझी तंद्री मोडली. तो म्हणाला,

मला माहिती आहे याबद्दल, माझ्या मम्मीला पण या सॅनिटरी नॅपकीन्सची गरज असते. तिने मला सांगितले आहे याबद्दल” My mother need sanitary napkins every month to keep clean herself, just like as I need a handkerchief to wipe my nose. पण शाळेत कोणीच आम्हाला याबद्दल काहीच सांगत नाही.

एका पाचवीच्या मुलाच्या तोंडून सॅनिटरी नॅपकीन हा शब्द ऐकून मला आश्चर्य तर वाटलंच पण मुलाच्या आईने दिलेल्या उदाहरणाचे कौतुकही वाटले. ज्याप्रमाणे मला नाक स्वच्छ ठेवण्यासाठी रुमालाची गरज असते त्याप्रमाणे आईला स्वच्छतेसाठी सॅनिटरी नॅपकीन्सची गरज असते.
मी त्याला म्हणाले,
“बरं मग तुला हे सगळं सांगितलं तर काय होईल ?”
“मॅडम जर मला हे समजलं तर मी पण मेडिकलरूम मधून त्यांना हे नॅपकिन आणून द्यायला मदत करू शकतो, जशी मी कधीतरी माझ्या आईलापण करत असतो.”
ईशानच्या बोलण्यातून त्याची मदतीची संवेदनशीलता जाणवली. आईच्या मासिक पाळी बरोबर जणू त्याच्यावरही छोटेसे कर्तव्य बजावण्याची पाळी आली होती, असे मला वाटले.

खरं तर मुळात झाकून ठेवावा किंवा लाज बाळगावी, असा हा विषयच नाही. कुठलीही १२ ते १४ वर्षे वयोगटातील शाळकरी मुलगी वयात आली की, मला हमखास “काकस्पर्श” चित्रपटातील “जन्म बाईचा बाईचा…. खूप घाईचा’ हे गीत आठवतं. काही ठिकाणी “पाळी येणे” हा एक सोहळा म्हणून साजरा होतो तर काही ठिकाणी तो चारचौघात न बोलण्याचा विषय असतो. त्यामागची अपवित्र आणि विटाळ ही संकल्पना तर अगदी वाईट आहे. देवापुढे जाऊ नये इथपासून पापड लोणची तयार करतांना रजस्वला स्त्रीची त्यावर सावलीही पडू नये असे वेगवेगळे अंधश्रद्धा जपणारे विचार! कधी कधी त्याला काही वैज्ञानिकतेचे दुजोरे सुध्दा जोडले जातात. अलीकडच्या काळात याबद्दल थोडीफार समाज जागृतीची सुरुवात झाली आहे. तरी या छोट्या ईशानच्या निमित्ताने ही जनजागृती केवळ स्त्री वर्गापूर्ती मर्यादित न ठेवता संपूर्ण घरासाठी आवश्यक आहे असे मला वाटले. खास करून पुरुष वर्गासाठी!

मला आठवतं तसं आमच्या घरात भावाशी या विषयावर आमचं कधीच बोलणं झालं नव्हतं. त्याला “मासिक पाळी” हा विषय समजला तो, शाळेतील विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकातून. ” कावळा शिवला” या कोडवर्डच्या मागे हीच पाळीची संकल्पना आहे हे त्याला दहावीला आल्यावर समजले. तोपर्यंत शाळेतील पी. टी.च्या तासाला मैदानावर न येता पोटात दुखतंय, असं सांगून वर्गातच बसणाऱ्या मुली त्याने कित्येकदा पाहिल्या होत्या. बाबांशी या विषयावर फार खुले बोलण्याचे प्रसंगही कधी आले नाहीत, पण आमच्या पाळीसाठी लागणारे पॅड नेहमी आमचे बाबाच आणायचे. त्यात त्यांना कधीच कमीपणा वाटला नाही. कोणत्याही घरातील वडील, भाऊ आणि मुलगा ही पुरुष मंडळीही या संदर्भात घराशी जोडलेली असतातच. त्यामुळे प्रत्येक घरात पाळीविषयी एक निकोप वातावरण तयार होणं ही काळाची गरज आहे.

“२८ मे जागतिक पाळी दिवसाच्या” निमित्ताने विचार करताना लक्षात आले की, ग्रामीण भागातील संकुचित विचार तेथील तरुणांना या गोष्टीबद्दल सजग जाणिवा करून देण्यासाठी कमी पडतात. स्मार्टफोनच्या माध्यमातून गुगल, यू ट्यूब यांसारखी माहिती मिळवण्याची साधनं उपलब्ध असली तरी पाळी या मुद्याबद्दल ज्ञान घेण्यास प्राथमिकता दिली जात नाही. तर याउलट शहरी भागात मित्रपरिवार किंवा तत्सम चर्चेतून संभोग हा विषय सहज बोलला जातो. त्यातील समस्या, निरोध (कंडोम) किंवा गर्भनिरोधक गोळ्या सारख्या साधनांचा वापर, निरोधचे निरनिराळे फ्लेवर्स इथपर्यंतच्या चर्चा रंगतात पण या कंपूत “पाळी येणे” या विषयावर सखोल चर्चा करणे तितकेसे गरजेचे वाटत नाही.

मुलगी वयात आल्यावर योनीमार्गातून दर महिन्यास जो रक्तस्राव होतो, त्याला मासिक पाळी (Menstrual Cycle/ एमसी) असे म्हणतात. मुलगी साधारणपणे १२-१३ वर्षांची झाली की, मासिक पाळी सुरु होते. कधी कधी या अगोदरही सुरु होऊ शकते. दर महिन्याला एक स्त्रीबीज बिजाडांतून पक्व होऊन बाहेर पडते. त्याच्या वाढीसाठी गर्भाशयात एक आच्छादन ही तयार केले जाते. योग्य काळात स्त्री व पुरूषाच्या वीर्यातील पुरूषबीज व स्त्रीच्या गर्भाशयातील स्त्रीबीज यांचा संयोग होऊन गर्भ तयार होतो. पण ज्यावेळी हे स्त्रीबीज फलित होत नाही त्यावेळेस फलित न झालेल्या बिजासहित आच्छादन बाहेर टाकले जाते. ते रक्ताच्या स्वरुपात योनी मार्गाद्वारे बाहेर टाकले जाते म्हणून हा रक्तस्राव होतो. ह्या कालावधीत स्त्रीच्या शरीरातून रक्त आणि ऊतक (टिश्यू) बाहेर पडतात आणि ही क्रिया सरासरी ३ ते ५ दिवसांपर्यंत सुरु राहते. मासिक पाळी दर महिन्याला येते त्यामुळे स्त्रीचे शरीर गर्भधारणेसाठी तयार होते. पाळीच्या पहिल्या दिवसापासून ते पुढच्या पाळीच्या एक दिवस आधी असे दिवस मोजल्यास मासिक पाळी चक्र २८-२९ दिवसांचे असते. काही स्त्रियांचे मासिक पाळी चक्र २१ दिवसांचे असते आणि त्यांचे मासिक पाळी चक्र छोटे असण्याची शक्यता असते. तसेच काहींचे मासिक पाळी चक्र ३५ दिवसांचे म्हणजेच सरासरीपेक्षा मोठे असते. कधी कधी स्त्रियांना मासिक पाळीमुळे PCOD सारख्या आजाराची समस्या निर्माण होते. ज्यात दहा स्त्रियांच्या मागे प्रत्येकी दोन स्त्रियांना अनियमित पाळीचा त्रास होत असतो. कालांतराने म्हणजे साधारणतः वय वर्षे चाळीस ते पंचेचाळीस किंवा पन्नाशीनंतर ही पाळी स्त्रीच्या शरीरातून येणे बंदही होते. केवळ अपत्यप्राप्तीसाठी पाळी येणे आवश्यक आहे हे इतकेच ठोकळ गणित नसते स्त्री शरीराचे! तो तिच्या शरीराचा एक मासिक भाग आहे, ज्यावर तिचे आरोग्य अवलंबून असते. ज्याचा परिणाम सतत स्त्रीच्या मानसिक आणि भावनिक प्रकृतीवर तसेच शरीरातील संप्रेरकांवर (हार्मोन्सवर) पडत असतो.

मुलगा, वडील, भाऊ, मित्र तसेच ऑफिसमधील बॉस किंवा सहकारी म्हणून या काळात स्त्रीमध्ये घडणाऱ्या मानसिक – भावनिक स्थित्यंतराचा अभ्यास पुरुष वर्गाला असणे गरजेचे आहे. तो अभ्यास असेल तर, घरात भाऊ या नात्याने तुम्ही तिला मानसिक आधार देऊ शकता. तुमची मैत्रीण कधीतरी तुमच्या सोबतच्या टू व्हीलर वरील प्रवासाला नकार देते तेव्हा मित्र म्हणून तूम्ही तिच्या नकाराचे कारण सहज समजू शकता. सतत हसत असणारी कामावरची तुमची मैत्रीण एखाद्या दिवशी कामाच्या तणावामुळे अचानक जास्त चीड चीड करताना दिसते तेंव्हा तिला काहीही न विचारता तिचा चेहरा वाचून तिची समस्या समजून घेण्याचे छोटेसे कर्तव्य प्रत्येक पुरुष पार पाडू शकतो. तिच्या कामाचा काही ताण हलका करू शकतो किंवा एक बॉस म्हणून या अडचणीच्या वेळी स्त्रीने घेतलेल्या अर्ध्या दिवसाच्या सुट्टीची समस्याही तो समजू शकतो.

काही ठिकाणी काही कार्यालयात संपूर्ण वेळ उभे राहूनच काम करावे लागते तेंव्हा अशा ठिकाणी मासिक पाळीच्या काळात स्त्रियांना अनेकविध त्रास होतात, अशावेळी कामाच्या ठिकाणच्या काही नियमात लवचिकता आणण्याचे प्रयत्न होऊ शकतात. (अनेकदा स्त्रीया पाळीचा बाऊ करून कामचुकारपणा करतात, या चुकीच्या समजुतीतून बाहेर येणे गरजेचे आहे, हे प्रत्येक स्त्री करते असा गैरसमज करून घेऊ नये) वेठबिगारीचे काम करणाऱ्या स्त्रियांच्या समस्या तर अधिकच बिकट असतात. त्यांच्या शरीराला कोणताही आराम मिळत नाही, अंगमेहनतीचे काम असल्यामुळे जराही उसंत नसते. या बाबतीत आपण वेठबिगारी कामाचे ठेकेदार म्हणून काय करू शकतो ? याचाही नक्की विचार केला पाहिजे. पाळीच्या काळातील सुरुवातीच्या दोन दिवसांतील समस्या या अधिक त्रासदायक असतात, त्यातील काही स्त्रीयांच्या स्वास्थ्याचा व त्या अनुषंगाने घेता येईल अशा रजेचा प्रश्न तर सरकारी पातळीवर दखल घ्यावी इतका गंभीर असतो.

सरतेशेवटी जीवनाचा जोडीदार म्हणून ज्या पुरुषाशी स्त्री विवाह करते त्याचा तर संपूर्ण आयुष्यभर सदर स्त्रीच्या मासिक पाळी येण्याशी थेट संबंध येतो. अशावेळी अर्धांगीनीच्या नाजूक समस्या समजून घेणं प्रत्येक पुरुषाचं प्राथमिक कर्तव्य ठरतं. पाळीच्या दिवसांत पत्नी अपवित्र आहे म्हणून तिच्या जवळ न जाणे ही भावना मनाशी बाळगणे तर आजच्या प्रगत काळात फारच चुकीची वाटते. “या चार दिवसात मला तिचा शरीर सुखासाठी काहीच उपयोग नाही” किंवा ” याकाळात स्त्रीच्या शरीराला एक कुजकट वास येतो म्हणून तिला जवळ घेऊ नये, तिला शिवू नये” असे बोलणे तर त्याहून जास्त गैर आहे. यावेळी स्त्रीला पती म्हणून तुमच्या शारीरिक, मानसिक आधाराची गरज असते. त्यात अंगदुखी, ओटीपोट किंवा कंबर दुखणे अशा समस्या अनेक स्त्रियांना होत असतात. अशावेळी तुम्ही तिची काळजी घेऊ शकता, तिच्यावरील कामाचा ताण किमान दोन दिवसांसाठी तरी कमी करू शकता. कधीतरी बायकोची पाळी अचानक पुढे जाते म्हणजे नेमकं काय होतं ? पाळी वेळेआधी येत असेल तर त्यातील नेमकी समस्या काय असू शकते, हे नेमकेपणाने तुम्ही पती म्हणून समजून घेतले पाहिजे. बदलत्या विश्वात पाळीतील स्वच्छतेसाठी वापरली जाणारी साधनंसुध्दा बदलत आहेत. सॅनिटरी नॅपकिन्स, टॅम्पोनस् ते मेन्स्ट्रुअल कप यासारख्या काळानुसार बदलत्या साधनांशी तुम्हीही स्वतः परिचित असायला पाहिजे. प्रत्येक वेळी दुकानातून पॅड घेऊन येणे हे तिचेच काम आहे, असे न समजता जेवढ्या नि:संकोचपणे तुम्ही मेडिकलमधून निरोधचे पॅकेट आणता तितक्याच सहजपणे कधी गरज पडली तर तिच्यासाठी पॅडही घेऊन यावेत. त्या विशेष चार दिवसात तुमच्या प्रेमळ स्पर्शाची साथ जर तुम्ही तिला दिली तर तिच्या वेदनाची तीव्रता निश्चितच कमी होऊ शकते. भारतीय विवाहसंस्था मान्यतेनुसार पत्नी पतीची हरेक बाबतीत तनमन अर्पण करून सेवा करत असते, तेंव्हा वेळप्रसंगी तिने केलेल्या सेवेचा परतावा म्हणून का होईना, तुम्हीही तिचे पाय चेपले तर त्यात चुकीचे काहीच नाही. त्यात कमीपणा बाळगू नका.

थोडक्यात, जुन्या काळातील चुकीच्या दृष्टिकोनातून मासिक पाळी येणे या शरीरधर्माला अपवित्र न ठरवता, या सामाजिक विटाळाच्या पलीकडे जाऊयात आणि तिच्या सक्षमतेला आपल्या प्रगल्भतेची साथ देऊयात!

ज्योती भारती

©️ ज्योती हनुमंत भारती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *