Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

मुंबई: राज्यात सध्या सुरू असलेल्या मिनी लॉकडाऊनला व्यापारी व अन्य काही वर्गांकडून विरोध होत असतानाच, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री यांनी आता वेगळेच संकेत दिले आहेत. ‘ रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन करावा लागेल,’ असं त्यांनी म्हटलं आहे. करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य सरकारनं मागील सोमवारपासून कठोर निर्बंध लादले असून शनिवार व रविवार या दिवशी कडक लॉकडाऊन घोषित केला आहे. सर्व घटकांशी चर्चा करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला होता. मात्र, त्यालाही विरोध होताना दिसतोय. निर्बंध शिथील करावेत अशी मागणी होत आहे. मात्र, तसे होण्याची अजिबात शक्यता नसल्याचं वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झालं आहे. ते ‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

महाराष्ट्रात करोना रुग्णवाढीचा वेग सर्वाधिक आहे. दिवसागणिक ५० हजारांहून अधिक नव्या रुग्णांची भर पडत आहे. त्या तुलनेत आरोग्य सुविधांवर ताण येताना दिसत आहे. एका बाजूनं आरोग्य यंत्रणा लसीकरणात गुंतली असताना वाढणाऱ्या रुग्णसंख्येला आरोग्य सेवा पुरवणं हे आव्हान होऊन बसलं आहे. अशा परिस्थितीत अधिक कठोर उपाययोजनांची गरज असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. वाचा: वीकेण्ड लॉकडाऊनबाबत विचारलं असता ते म्हणाले, ‘वीकेण्ड लॉकडाऊन नितांत आवश्यकता होती. आता वाढणाऱ्या करोना रुग्णांची संख्या सध्या ज्या गतीनं वाढत आहे ते पाहता वीकेण्ड लॉकडाऊन पुरेसा नाही.

कारण पुढच्या दहा दिवसांत करोना रुग्णांचा एकूण आकडा १० लाखांच्या पुढं जाण्याची शक्यता आहे. आम्ही कितीही उपाययोजना केल्या तरी मनुष्यबळ कमी पडणार आहे. डॉक्टर, नर्स कमी पडतील. हे सगळे आणणार कुठून? त्यामुळं किमान तीन आठवड्यांचा पूर्ण लॉकडाऊन लावावाच लागेल. आपत्ती व्यवस्थापन खात्याचा मंत्री म्हणून मी आज मुख्यमंत्र्यांना ही विनंती करणार आहे. कडक लॉकडाऊनशिवाय लोकांचे प्राण वाचवणं अशक्य आहे. एकीकडं महाराष्ट्रातील दिवसेंदिवस परिस्थिती चिघळत आहे आणि दुसरीकडं केंद्र सरकारनं मदतीचा हात आखडता घेतला आहे. त्यामुळंही आपल्याला लॉकडाऊनची गरज आहे.’ ‘मुंबई लोकल ट्रेनमधील गर्दी कमी करणंही आवश्यक आहे. आता सरसकट सुरू असलेल्या लोकलवर बंधन आणावी लागतील. प्रवासावर निर्बंध आणावे लागतील. काही वेळा ठरवून द्याव्या लागतील. आरोग्य यंत्रणेला बाधा येणार नाही हे पाहावं लागेल,’ असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *