Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

Big9news Network

ज्येष्ठ नागरिक हे समाजासाठी संपत्ती असून त्यांचा सन्मान करावा. त्यांच्या अनुभवाचा उपयोग समाजासाठी व्हावा. समाजकार्य विद्यार्थ्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या योजनांचा सखोल अभ्यास करुन तळागाळापर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त कैलास आढे यांनी केले.

सहायक आयुक्त, समाज कल्याण, सोलापूर, भाई छन्नूसिंग चंदेले समाजकार्य महाविद्यालय आणि महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम),पुणे प्रादेशिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध जागृती दिवसानिमित्त आयोजित ऑनलाईन वेबीनारमध्ये श्री. आढे बोलत होते. यावेळी समाज विश्लेषक प्रा.विलास बेत, फेस्कॉमचे अध्यक्ष चंद्रकांत महामुनी, उपाध्यक्ष नाना इंगळे, सल्लागार ॲङ प्रमोद ढोकळे, फेस्कॉमचे सचिव हनुमंत कुंभार, स्मृती केंद्राचे विश्वस्त प्रा.डॉ.रोझा चंदेले, चंदेले कॉलेजचे प्र.प्राचार्य सिध्दार्थ गायकवाड, प्रा. बी.एम. भास्कर यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, वालचंद कॉलेज, भारती विद्यापीठ येथील प्राध्यापक,राज्यातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांसह सामाजिक न्याय विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते.

श्री. आढे यांनी शासनाचे ज्येष्ठ नागरिक धोरण, सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली.

प्रा. बेत म्हणाले, युवकांनी जेष्ठांची परिस्थिती व समाज यामध्ये अनुभवाचा, कर्तत्वाचा, क्षमतांचा विचार करुन त्यांना आपल्या कुटुंबव्यवस्थेमध्ये मानाचे स्थान द्यावे.

घरातील व्यक्तींनी ज्येष्ठांचा मान ठेवला तर समाजामध्ये त्यांना  सन्मान मिळेल. राजकिय व सामाजिक कार्यकर्त्यांनी मुलभूत सुविधाबाबत लक्ष घालावे. कुटुंबातील सदस्यांचे समुपदेशन होणे गरजेचे असल्याचे श्री. इंदळे यांनी सांगितले.

ॲड. ढोकळे यांनी ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध कायद्याविषयी विश्लेषण करुन विविध कलमांचा उहापोह केला. कुटुंबाने अन्न, वस्त्र, निवारा याची गरज पूर्ण केल्यास कायद्याला सामोरे जाण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. महामुनी यांनी सांगितले की, समाज कल्याण विभागानी कोरोनाच्या काळात अत्यंत सूक्ष्म कार्य करुन ज्येष्ठांची आरोग्य, अन्नाविषयी काळजी घेऊन ज्येष्ठांना मानसिक आधार दिला, हे कौतुकास्पद आहे. ज्येष्ठांच्या कायदेशिर समस्याबाबत सोडवणूक केल्याची माहिती त्यांनी दिली.

श्री. कुंभार यांनी महाराष्ट्रात शासनाच्या धोरणाप्रमाणे सर्वात प्रथम सोलापूर जिल्ह्यात जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय संनियंत्रण समिती गठीत करुन कार्याला प्रत्यक्ष सुरुवात केली आहे. याद्वारे ज्येष्ठांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि ज्येष्ठांना न्याय देण्याचे काम होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

सूत्रसंचालन प्रा.बाळासाहेब भास्कर यांनी केले. प्र.प्राचार्य गायकवाड यांनी कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *