ॲड. प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्र सरकारला केली ही विनंती

दि.३ : महाराष्ट्रात कोरोनाने कहर केला आहे. वाढणाऱ्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जनतेशी संवाद साधला. वाढणाऱ्या रुग्ण संख्येवर चिंता व्यक्त करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी निबंधांची कठोर अंमलबजावणी करण्याचे संकेत दिले, तसेच येत्या दोन दिवसात परिस्थिती पाहून लॉकडाऊन संदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

महाराष्ट्र पुन्हा एकदा लॉकडाउनच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना स्वयंशिस्त पाळण्याचं कळकळीचं आवाहन करतानाच लॉकडाउन करण्याचा इशारा दिला आहे. लॉकडाउन न करण्याची मागणी जोर धरताना दिसत आहे. याच मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे सरकारला विनंती केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. राज्यातील करोना परिस्थितीची जाणीव करून मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना करोना नियमावलीबाबत स्वयंशिस्त पाळण्याचं आवाहन केलं. राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर पडणाऱ्या ताणाबद्दल कल्पना देत परिस्थिती कायम राहिली, तर लॉकडाउनशिवाय पर्याय नसल्याचं ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर लॉकडाउन न करण्याची मागणी होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही ट्वीट करून सरकारला विनंती केली आहे. “लॉकडाऊन पुन्हा लावण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय. यामुळे आर्थिक व्यवहार ठप्प होतात. याने सर्वसामान्य मध्यमवर्गीयांच्या पोटावर पाय येईल. लॉकडाऊननं करोना आटोक्यात येणार नाही. शिस्त पाळणे, फिजिकल अंतर पाळणे गरजेचं आहे. सरकारला आमची विनंती राहील की, लॉकडाऊन करू नये,” असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.